लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे युती आणि आघाड्या होऊ लागल्या आहेत. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीची घोषणा होऊ शकते. भाजपच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार आघाडी उघडली असून, आता राज्यातील युतीमध्ये मनसे शिरकाव करण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तर आघाडीचे दरवाजे जवजळ बंद झाल्यात जमा आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होऊ शकता असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

भाजप-शिवसेना युतीचा मनसेला राजकीय फायदा होऊ शकतो. भाजपबरोबर केलेली युती अनेक कडव्या शिवसैनिकांना मान्य झालेली नाही. भाजपने पाच वर्षे सातत्याने अपमान केला आणि गरज होती तेव्हा मदत घेतली, अशी शिवसैनिकांची व्यथा आहे. ‘भारत बंद’दरम्यान राज्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये मनसेच्या नावाचा जो काही बोलबाला झाला, त्याचीही मनसेला फायदा होऊ शकतो.

शिवसेनेची किती मते भाजपकडे वळतील हा प्रश्नच आहे. यापेक्षा शिवसेनेची काही प्रमाणात मते मनसेकडे वळू शकतात. कारण भाजपपेक्षा शिवसैनिकांना मनसे किंवा राज ठाकरे अधिक जवळचे वाटतात. याशिवाय शिवसेनेच्या विचारांचे अथवा कुंपणावरील मतदार भाजपपेक्षा मनसेला मते देऊ शकतात. युती झाल्याने शिवसेनेची सर्वच मते भाजपकडे वळतील असे नाही. ही मते राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात, पण काँग्रेसला मिळू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत विधानसभेला ही मते मनसेकडे जाऊ शकतात.