‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्‍हयात झालेल्‍या शेतीच्‍या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील, ढोबळमानाने जिल्‍हयात २२ हजार कृषी क्षेत्र बाधित आहे. फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून या नेस्तनाबुत झालेल्या बागांची पुन्हा उभारणी केली जाईल, फळबागांच्या साफसफासाठी रोजगार हमी योजनेची मदत घेण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

कृषी मंत्री भुसे यांनी आज रायगड जिल्‍हयातील वादळग्रस्‍त भागांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली. तसेच, नागरीक व शेतकऱ्यांशी संवाद साधला . यावेळी त्‍यांच्‍यासमवेत पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.  त्‍यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांना फळबागा दुरूस्‍त करण्‍यासाठीदेखील मोठा खर्च येणार आहे, हे काम रोजगार हमी योजनेतून घेतले जाईल , असे त्‍यांनी यावेळी सांगितले .

करोनामुळे  मुंबईकर चाकरमानी मोठया संख्‍येने कोकणातील आपल्‍या गावी आले आहेत . हे लक्षात घेवून यावेळच्‍या खरीप हंगामाची तयारी करण्‍यात आली आहे . यंदा खरीप हंगामात कोकणात १० हजार क्षेत्र वाढेल असा अंदाज असून त्‍या दृष्‍टीने नियोजन करण्‍यात आले आहे . खते बियाणे यांचा वाढीव पुरवठा करण्‍यात येणार असल्‍याचेही दादा भुसे यांनी  स्‍पष्‍ट केले .

अर्धवट तुटलेल्‍या झाडांचे पुनरूज्‍जीवन –
चक्रीवादळात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे . त्‍यात झाडे उन्‍मळून पडली आहेत तर काही झाडं ही अर्धवट तुटलेल्‍या अवस्‍थेत आहेत . नवीन लागवड केल्‍यानंतर त्‍यापासून उत्‍पन्‍न मिळण्‍यात वेळ जाणार आहे . हे लक्षात घेवून अर्धवट तुटलेल्‍या झाडांचे पुनरूज्‍जीवन करता येईल का? या दृष्‍टीने प्रयत्‍न करणार असून त्‍यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे . विद्यापीठाचे पथक लवकरच येवून याबाबत पाहणी करेल असेही दादा भुसे यांनी सांगितले .