जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या सव्वाचार कोटींच्या गैरव्यवहाराची जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्याचे आदेश विभागीय निबंधकांनी दिले असून, यासाठी लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेला झालेल्या १५७ कोटींच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून, याबाबतचा निर्णय सध्या शासनस्तरावर प्रलंबित आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत २००१ ते १२ या कालावधीत झालेल्या अपहाराची चौकशी करण्यासाठी उपनिबंधक मनोहर माळी यांनी चौकशी करून १५ प्रकरणी ४ कोटी १८ लाखाचा गरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढला होता. तसा अहवाल विभागीय निबंधकांना सादर करण्यात आला. या अहवालावर ४ कोटी १८ लाखाच्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश सोमवारी निबंधकांनी दिले आहेत.
बेकायदा नोकर भरतीत बँकेचे किती नुकसान झाले हे चौकशीत स्पष्ट झालेले नाही, मात्र अन्य काही प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये रंगरंगोटी, दुरुस्ती, बांधकाम यामध्ये ४ लाख ६३ हजार, सावळज शाखा बांधकाम ९८ हजार, आटपाडी शाखा बांधकाम २८ हजार, बँक हमी परत करणे २ कोटी १६ लाख, वाळवा बचत गट खर्च ६३ लाख, निवृत्तांना मुदतवाढ ६ लाख ८० हजार, कॅमेऱ्यांची खरेदी ५६ हजार, आष्टा सोसायटी एकरकमी परतफेड सवलत ४६ लाख, संगणक खरेदी ७३ लाख ६७ हजार आणि संचालकांचा अभ्यास दौरा ९८ हजार हा खर्च गरव्यवहार असल्याचे तपासणीवेळी आढळून आले आहे.