वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता. वंचितसह ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. अमरावतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले.

घाटकोपरमध्ये बसवर झालेली दगडफेक आमच्या कार्यकर्त्याने केलेली नाही. दगडफेक करणारा चेहरा झाकून आला होता. दगडफेक केल्यानंतर तो पळून गेला. चेहरा झाकून आंदोलनात उतरायचे नाही हे आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सांगितले होते. बजरंग दल आणि भाजपाने या बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एनआरसी आणि सीएए या कायद्याचा मुस्लिमांवरच नव्हे, तर हिंदुवरही परिणाम होणार आहे. हिंदुनाही नागरिकत्व सिद्ध करताना अडचणी येतील असे आंबेडकर म्हणाले. देश दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहे. फेब्रुवारीमध्ये तोटयाच बजेट सादर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडून २४ लाख कोटी जमतील सांगण्यात आलं होतं. पण त्यातले ९ लाख कोटी जमा होणार नाही अशी स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईत बंदचा प्रभाव दिसला नाही या प्रश्नावर ते म्हणाले की, दादरमध्ये कपडा बाजार आहे. जिथे दररोज काहीशे कोटींचा व्यवहार होतो पण आज ५० कोटींचा सुद्धा व्यवहार झालेला नाही असा दावा त्यांनी केला.