राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूच्या गंभीर घटना घडताना दिसत आहेत. नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशीच घटना घडल्याचं वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर नातेवाईकांनी केलेला आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे.

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहा करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे दिलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन आणि तीन या वार्डांमध्ये करोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या वार्डातील ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. ऑक्सिजन बंद झाल्यानेच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही नातेवाईकांनी सांगितलं. अर्धा ते एका तासा दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती यासंदर्भात बोलताना स्वाराती रुग्णालयाच्या प्रशासनं दिली. ज्या रुग्णांचे मृत्यू झाले, त्यांना करोनाबरोबर सहव्याधी होत्या आणि रुग्णालयात येतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती असंही न्यायालयानंही म्हटलं आहे.

“मागील तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण त्याच्यासाठी लातूर, औरंगाबाद, जालना, बीड येथून ऑक्सिजन मागवत आहोत. आजही सकाळपासून लातूरहून ऑक्सिजन सिलेंडर मागवले. आयसीयूजवळ मी स्वतः होतो. वार्ड नंबर तीनजवळही उभा होतो. या घटनेचा पूर्ण अहवाल मी मागवला आहे. अहवाल आल्यानंतर सगळं स्पष्ट होईल, पण ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू झाल्याचं चूक आहे,” असं सांगत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.