सफाळे भागात असणाऱ्या कोळंबी प्रकल्पांमध्ये दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोरी व लुटमारीच्या घटनांमध्ये केळवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना पालघरच्या पोलीस अधीक्षक यांनी शासन सेवेतून निलंबित केले आहे. अलीकडे घडलेल्या कोळंबी चोरीच्या प्रकरणात बुधवारी रात्री तातडीने दरोड्याचा गुन्हा दाखल करून, या प्रकरणात सहा आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली आहे. सफाळेच्या पश्चिमेच्या भागात असणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे लहान- मोठ्या कोळंबी प्रकल्पांमध्ये चोरीचे अनेक प्रकार घडत असत. मात्र अलिकडे हे प्रकार दिवसाढवळ्या संघटित व नियोजित प्रकारे होऊ लागल्याने कोळंबी प्रकल्प मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. 16 जून रोजी जलसार येथील एका कोळंबी प्रकल्पात टेंभीखोडावे येथील 100 ते सव्वाशे नागरिकांनी अडीचशे ते तीनशे किलो कोळंबी जबरदस्तीने लुटून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच प्रमाणे 18 जून रोजी खार्डी येथे एका कोळंबी प्रकल्पात 13 -14 जणांनी काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करून त्यांना खोलीत डांबून ठेवून 65 किलो कोळंबी चोरून नेली व नंतर दगडफेक केल्याचे तक्रार केळवा सागरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना, त्यासंबंधी कारवाई झाली नसल्याचे पालघर पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आले. पालघर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांनी केळवा पोलीस स्टेशन येथे जाऊन घटनेची माहिती घेऊन याबाबत 23 जून रोजी रात्री 11 वाजता दरोड्याचा गुन्हा दाखल केला, असून या प्रकरणी तातडीने सहा आरोपींना रात्रीच अटक केल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, केळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू नरवडे यांना 24 जून रोजी शासन सेवेतून निलंबित केले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी व गुन्ह्या संदर्भात मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारीने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक यांनी विविध पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.