जिल्हाधिकारी कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरित होण्यास २०२१ उजाडणार लोकसत्ता प्रतिनिधी पालघर : पालघर जिल्ह्य़ाच्या विकासासाठी गतिमान कामकाजाची आवश्यकता विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. मणिक गुरसळ यांनी व्यक्त केली आहे. आजवरच्या सरकारी स्पष्टीकरणावरून जिल्हा मुख्यालयाचे बांधकाम नोव्हेंबपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु ते आता शक्य नसल्याचे ऑक्टोबरच्या अखेरीस दृष्टीपथात आली आहे. मुख्यालयाचे काम पूर्ण होऊन सर्व विभाग एकत्र येण्यास मार्च २०२१ उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीची उभारणी सिडकोमार्फत करण्यात येत आहे. जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेला हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. या प्रकल्पातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय नोव्हेंबपर्यंत नवीन वास्तूत कार्यरत करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली असली तरी या इमारतींची सद्यस्थिती पाहता मार्च २०२१ पर्यंत इमारतीत पूर्ण क्षमतेने कार्यालये सुरू करण्यात येतील, अशी शक्यता आहे. राज्य शासनाकडे मुख्यालय उभारणीसाठी निधी नसल्याने ४४४ हेक्टर जागेपैकी ३३४ हेक्टर जमीन सिडकोला स्वतंत्ररीत्या विकसित करण्यासाठी देण्यात आली. त्या बदल्यात १०३ हेक्टर क्षेत्रावर जिल्हा मुख्यालय उभारण्याची योजना तयार करण्यात आली. हे मुख्यालय जानेवारी २०१९ पर्यंत कार्यरत करण्याची मुदत देण्यात आली होती. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे काम सुरू आहे. या दोन्ही कार्यालयांमध्ये संबंधित विभाग नोव्हेंबरपूर्वी स्थलांतरित होतील. जिल्हा परिषद कार्यालय तसेच इतर कार्यालयांसाठी उभारण्यात येणाऱ्या दोन इमारतींचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम मार्च २०२१ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच ठाणे येथे कार्यरत असलेल्या अनेक कार्यालयांसाठी पालघर जिल्हा मुख्यालय संकुलात जागा उपलब्ध होणार असून नव्याने पदनिर्मिती करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात विद्युत तारा, फॉल सिलिंग करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, रंगरंगोटी तसेच अधिकारी कर्मचारी यांची दालने आणि आसन व्यवस्था तयार करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागणे अपेक्षित आहे. आहे सुबक तरी.. नवीन जिल्हा कार्यालय संकुल सध्या जिल्ह्य़ताील सर्वाच्याच कुतूहलाचा विषय ठरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बाहेरून सुबक आणि आकर्षक दिसत आहे. तरीही या इमारतींच्या कामाच्या दर्जाबाबत काही तक्रारी पुढे आल्या आहेत. त्याबाबत अद्याप तरी सरकारी पातळीवरून काही स्पष्टीकरण आलेले नाही. तरीही सध्या सुबक दिसत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम पुढे किती काळ मजबूत राहील याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.