राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दीर्घकाळापासून  सोडवल्या गेलेल्या नाहीत. यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. याविषयी शासनाने अनेकदा आश्वासने देऊन कोणताही ठोस निर्णय न  घेतल्याने शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ शिक्षक महासंघाने शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले आहे.  त्या अनुषंगाने महाविद्यालय शिक्षक संघटनेच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. रजेसिंग कोळी, तालुका अध्यक्ष प्रा. राजेश किणी, प्रा. रवींद्र गुप्ता प्राध्यापक विलास सापते हे सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या –
१.मूल्यांकनावरून पात्र घोषित व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे.
२.2002- 2003 पासून वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पद मंजुरी व अनुदान देणे.
३.आय.टी विषयाच्या शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन देण्यात यावे.
४.सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
५.शासकीय कर्मचाऱ्यांना या प्रमाणे दहा-वीस- तीस वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना देखील लागू करण्यात यावी.