एकीकडे राज्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेश असताना पालघर तालुक्यातील केळवा रोड येथील दोन तरूणांनी खंडाळा येथून 175 किलोमीटरचा प्रवास करून आपले घर गाठले आहे. पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रणा गुंगारा देऊन पळ काढला.

केळवे रोड येथील धोंधल पाडा येथील दोन तरुण कामानिमित्त खंडाळा पारगाव येथे एका कंपनीत कार्यरत होते. संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांना घरी परतण्याचे मार्ग बंद झाले होते. अनेक प्रयत्न करून त्यांना पालघर येथे येण्याची परवानगी मिळत नसल्याने त्यांनी 27 एप्रिल च्या रात्री मोटर सायकलवरून प्रवास करून माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथून त्यांना तपासणीसाठी पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांची चाचणी करून त्यांचे अलगिकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर आपले कपडे घेऊन येतो असे सांगून आरोग्य कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून ते पसार झाले.

एकीकडे 16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची हत्या झाली होती. तसेच धरावी येथील एक व्यक्ती मोटरसायकलवरून बोईसर येथे अशाच पद्धतीने आला होता. तिकडे जिल्हा बंदी आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न असताना नाकाबंदी व तपास यंत्रणेतील त्रुटी अशा घटनांमूळे पुढे येत आहेत.