पालघर : कुपोषित बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने पायलट प्रकल्प हाती घेतला असून पालघर जिल्हा यापुढे कुपोषणामुळे नव्हे तर पर्यटनासाठी ओळखला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार येथे केले. जव्हार शहराच्या विकासासाठी ३७ कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. जव्हार नगर परिषदेच्या शतकपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. पर्यटनाच्या ‘क’ वर्गात असलेल्या जव्हारला विशेष बाब म्हणून ‘ब’ वर्गात वर्गीकरण करण्याची घोषणा केली. शहरातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आणि तिथे पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी १० कोटी रुपयांची घोषणा त्यांनी केली. जव्हारच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तसेच जलसंधारण प्रकल्पासाठी १७.३४ कोटींच्या योजनेला त्यांनी मान्यता दिली.