पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन शिवसेनेच्या भारती कामडी विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसने सुचवलेले अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेसाठी त्रिशंकू झालेल्या निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. दुसरीकडे, भाजपातर्फे अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले व उपाध्यक्ष पदासाठी जयवंत डोंगरकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी मनिषा बुधर (कम्युनिस्ट पक्ष) व उपाध्यक्षपदासाठी विष्णू कडव (बविआ) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या नवीन जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे १८, राष्ट्रवादी काँग्रेस १४, भाजपाचे १२, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे - ५, बहुजन विकास आघाडीचे -४, काँग्रेसचा एक तर तीन अपक्ष सदस्य निवडून आले होते. यातील प्रत्येकी एका अपक्ष सदस्याने राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडी त्यांना पाठिंबा दिल्याने, शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ३३, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष- बहुजन विकास आघाडीचे संख्याबळ- ११ तर भाजपाचे १२ सदस्य यांच्यात निवडणूक होणार होती. मात्र, निवडणुकीच्या रिंगणातील इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने भारती कामडी व नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी जाहीर केले.