रायचूर विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा अहवाल कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी तर सोडाच पण शेतीसाठी देखील घातक आहे, असा इशारा कर्नाटकातील रायचूर विद्यपीठातील शास्त्रज्ञांनी येथे दिला. त्यांनी काढलेल्या या निष्कर्षांमुळे पंचगंगेचे पाणी कोणत्या प्रदूषितस्तराला गेले आहे याचा दाखला मिळला असून तो नदी - पर्यावरणप्रेमींना धक्का देणारा आहे. या दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात पिकणारा भाजीपाला खाल्लय़ाने कर्करोगासारखे आजार उद्धभवतात, असा उल्लेखही या प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आला आहे. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी रायचूर विद्यापीठातील तज्ज्ञांमार्फत शिरोळ तालुक्याचा अहवाल तयार केला आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ाची जीवनदायिनी पंचगंगा नदी आत्यंतिक प्रदूषित झाली असून नदीचे पाणी पिण्यासाठी योग्य नाहीच शिवाय शेतीसाठी देखील योग्य नसल्याचा अहवाल समोर आला आहे. जिल्ह्य़ातील शिरोळ तालुका म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना भाजीपाला पुरवणारे केंद्र म्हणून ओळखला जातो. मात्र हाच तालुका या भाजीपाल्यामार्फत रोगराई पसरवणारे आगार बनत असल्याची भीती निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रायचूर विद्यापीठातील तज्ज्ञाच्या सहकार्याने गेल्या दोन महिन्यांपासून शिरोळ तालुक्यातील पाणी, माती आणि भाजीपाला यांचे विविध ठिकाणचे नमुने घेऊन त्यांच्या प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यामध्ये हे पाणी पूर्णत: दूषित असून ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी अयोग्य असल्याचा प्राथमिक अहवाल आज सादर करण्यात आला आहे. हा भाजीपाला खाल्ला तर कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. रायचूर विद्यापीठाचे संशोधक डॉ. शंकर गौडा, तज्ज्ञ डॉ. आशुतोष पाटील यांनी ही माहिती येथे आज दिली. शिरोळ तालुक्यातील दूषित पाण्यावर पिकणाऱ्या भाजीपाल्यामुळे जनतेला रोगराई होऊ नये तसेच दोष नेमका कशात आहे, हे शोधण्यासाठी गेले २ महिने तज्ज्ञांच्या बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरोळ तालुक्यात फिरत आहेत. प्राथमिक अहवालानुसार यापुढे दूषित पाण्यावर शेती आणि भाजीपाला पिकवू नये यासाठी शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात ईली आहे