पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या महिन्याभरापासून करोना काळात देखील या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करण्यात येत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा देखील या मतदारसंघात झाल्या आहेत. त्यामुळे भाजपा आणि महाविकासआघाडीकडून देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यात करोनाचे निर्बंध लागू असताना देखील झालेल्या प्रचारसभांवरून आरोप-प्रत्यारोप झाल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाकडे सगळ्यांनीच लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारातून राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर तीव्र टीका केल्याचं देखील दिसून आलं.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. एकीण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असणाऱ्या या मतदारसंघात महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके आणि भाजपाप्रणीत महायुतीकडून भाजपाचे समाधान अवताडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याशिवाय, स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाल्याचं दिसून आलं. आज ५२४ मतदान केंद्रांवर ५२४ कंट्रोल युनिट, १०४८ बॅलेट युनिट आणि ५२४ व्हीव्हीपॅट मशीन असणार आहेत. त्याशिवाय करोनाचे सर्व निर्बंध पाळूनच मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न ठरला मुद्दा!

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेचा आणि राजकीय सभांचा विषय ठरला होता. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आणि आजच्या मतदानासाठी देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम व अटी लागू केल्या आहेत. मात्र, १४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून या मतदारसंघाला वगळण्यात आलं होतं. आज मतदान झाल्यानंतर इथे देखील लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

पंढरपूर पोटनिवडणूक – प्रचारात नेमकं काय घडलं?

या रिक्त जागेवर राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपाने वेगळे समीकरण मांडत उद्योजक समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. यापूर्वीही तीन वेळा आवताडे यांनी निवडणूक लढवली आहे. या लढतीसाठी भाजपाचे सहयोगी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक हे देखील इच्छुक होते. मात्र परिचारक आणि आवताडे यांना एकत्र आणून भाजपाने बेरजेचे राजकारण केले.