कार्तिकी वारीच्या कालावधीत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी भाविकांनी दिलेले दान सढळ हस्ते आहे हे स्पष्ट झाले आहे. या कालवाधीत १ कोटी ९८ लाख २१ हजार ४३४ रुपये विविध दानातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले आहेत.  गेल्या वर्षी कार्तिकी वारीत जवळपास १ कोटी ३० लाख ४५ हजार ३२५ रुपये एवढे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले होते अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

वारकरी संप्रदायातील कार्तिकी वारीला विशेष महत्त्व आहे.  या वारीला मुंबई,कोकण,मराठवाडा या सह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून भाविक न चुकता दरवर्षी येतो. यंदाच्या वर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. आणि ऐन एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पावसाने हजेरी लावल्याने वारीवर पावसाचे पाणी फिरणार असा अंदाज होता. मात्र यावर्षी सावळ्या विठूराया चरणी भाविकांनी भरभरून दान दिले आहे.

या शिवाय बुंदी लाडू विक्री मधून ३३ लाख २३ हजार ८५० आणि राजगिरा लाडू विक्रीतून ३ लाख ३३ हजार ५०० रुपये समितीला मिळाले आहे. तसेच फोटो विक्रीतून ६६ हजार ६५०, भक्त निवास,वेदान्ता ,व्हिडीओकॉन भक्त निवास या माध्यमातून ४ लाख ९१ हजार ०९० उत्पन्न समितीला प्राप्त झाले आहे.  नित्यपूजा ४ लाख, हुंडी पेटी २४ लाख ८८ हजार ५३७, इतर देणगी २ लाख ७१ हजार ७३० तर अन्य स्वरूपात ३ लाख ४५ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन ५ लाख ०६ हजार ३३५ भाविकांनी तर जवळपास ३ लाखाहून भाविकांनी मुख दर्शन घेतल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

बेंगळुरुचे उद्योजक एन जी राघवेंद्र व बिपिन बि जलानी यांनी विठ्ठलाला ६३३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. या हाराची किंमत २५ लाख रुपये आहे. परंतु जीएस टी करामुळे या हाराची आणखी किंमत वाढते. एन जी राघवेंद्र यांनी यापूर्वी विठ्ठलाला शालीमार व मोत्याचा हार देखील अर्पण केला होता. एन जी राघवेंद्र व त्यांच्या पत्नी उषा राघवेंद्र हे मागील २० वर्षांपासून विठ्ठलाची वारी करीत आहेत. राघवेंद्र यांनी विठ्ठलाला दान दिलेला हार विठ्ठलाच्या गळ्यात घातला होता. यानंतर राघवेंद्र व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा सत्कार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला.