करोनाच्या संकटानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आषाढी पाठोपाठ कार्तिक यात्रेलाही वारकऱ्यांना माऊलीच्या दर्शनाविनाच राहावं लागणार आहे. करोना प्रसाराची भीती असल्यानं कार्तिकी यात्रा काळात पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर चार दिवस बस सेवाही बंद राहणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याविषयीची माहिती दिली.

करोनाची दुसरी लाट येण्याची भीती असून, त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाचा धोका टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होत असल्यानं दशमीपासून म्हणजेच २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांनी दिली.

ज्या भाविकांनी अथवा दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण केलं असेल, त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांना व दिंड्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात येणार असल्याचंही झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत जाऊ नये, यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जात असली, तरी करोनाचा वाढत धोका बघता शासन व प्रशासनाकडून त्याला परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना करोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही मूभा देण्याबद्दल सध्या प्रशासनाकडून विचार केला जात आहे.