महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंकजा यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनीच त्याचा पराभव केला. हा पराभव धक्कादायक आहे असं मत मुख्यमंत्र्यांनाही व्यक्त केले आहे. मात्र दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या पराभवानंतर पंकजा मुंडे या मुंबईतील घरी परतल्या असून त्यांनी दिवाळी मुंबईतच साजरी केली. मंगळवारी त्यांनी राज्यातील मंत्री महादेव जानकरांचे औक्षण करुन भाऊबीज साजरी केली. मागील अनेक वर्षांपासून जानकर न चुकता रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पंकाजा यांच्या घरी जातात. परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा ३० हजार ७०१ मतांनी पराभव केला. परळीतील या पराभवानंतर पंकजा यांनी दिवाळी मुंबईतील राहत्या घरी साजरी केली. अनेक कार्यकर्त्यांनी पंकजा यांना मुंबईतील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. परळीतला हा पराभव पंकजा यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे. पराभवानंतर पंकजा यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी "मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा. कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच, तो अंतिम असतो बस्स!" असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान धनजंय मुंडे यांनी विजयाचा आनंद व्यक्त करतानाच पंकजा यांच्या पराभवाचे दु:ख झाल्याचे म्हटले होते. “माझ्या अंगाला विजयाचा गुलाल लागावा, अशी इच्छा होती. आज मात्र माझ्या अंगाला लागलेला गुलाल बघायला ते नाहीत. मला जनतेनं खुप प्रेम दिलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एकीकडं या विजयाचा आनंदही आहे आणि दुसरीकडं खंतही आहे. कारण ते (पंकजा मुंडे) मानत नसलं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे. मनात कुठेतरी आहे. शेवटी कुटुंबातील व्यक्तीचा हा पराभव आहे. त्यामुळे मनात खंत आहेच,” असं सांगताना धनंजय मुंडेंच्या डोळ्यात पाणी तरळले होते. असे असले तरी दोन्ही भावा बहिणीमध्ये असणाऱ्या मतभेदांमुळे पंकजा यांनी सालाबादप्रमाणे यंदाही महादेव जानकर यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. गोपीनाथ मुंडे मंत्री होते तेव्हापासून जानकर पंकजा यांच्यासोबत भाऊबीज आणि रक्षाबंधन साजरे करतात. दरम्यान पंकजा यांचा परळीमध्ये पराभव झाला असला तरी गोपीनाथ मुंडे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यामध्ये आहे. केवळ पराभव झाला म्हणून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवलं जाणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. विधानपरिषदेमध्ये पंकजा यांना संधी देऊन त्यांना महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंकजा यांना मोठा जनाधार असल्याने त्यांना डावललं जाऊ नये अशी मागणी सुरेश धस आणि मराठवाड्यातल्या अनेक आमदारांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.