गोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते. आता तुम्ही मला ज्या जागी बसवले तिथे जनतेच्या हिताचं सरकार आणणं हे माझं कर्तव्य आहे. खुर्चीवर बसणं माझं कर्तव्य नाही, मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. राजधर्म निभावणं हेच माझं काम आहे, तुमचा विकास करणं हे काम आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील संघर्षांनंतर सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे स्थलांतरीत केलेला ‘दसरा’ मेळावा गुरुवारी पार पडला. या मेळाव्याला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, राजकारणासाठी, मतांसाठी चुकीची तडजोड करणार नाही. आपण स्वाभिमानी आहोत. राजधर्म निभावणं हेच माझं काम आहे. तुमचा विकास करणं हे माझं काम आहे. भविष्यात विकासच सर्व रोगाचे उच्चाटन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला. दुर्लक्षितांना मोठ्या पदांवर संधी दिली. आता त्यांच्या लेकीची सत्ता आहे म्हणून मायेने तुमच्या पदरात विकासाची ओटी भरायला आली आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना भावनिक सादही घातली.

भाजपाच्या सर्वेक्षणात प्रीतम मुंडे यांची खासदारकी धोक्यात असल्याचे म्हटल्याचे वृत्त होते. याचाही पंकजा मुंडेंनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. सर्व्हे कोणी केला. इथे जमलेली गर्दी पाहावी. सर्वेक्षणाच्या आधारे तिकीट दिले जात नाही. तर माणसं बघून तिकीट दिले जाते. महाराष्ट्रात २०१९ मध्ये विजयी घंटा वाजणारच. राज्यात आणि देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला. भक्तीचा बाजार मांडणं ही संताची शिकवण नाही, असे त्यांनी नमूद केले. मी कधीही थकणार नाही, थांबणार नाही आणि कोणासमोर झुकणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.

नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यावरुन विरोधक टीका करत आहे. या सरकारी कार्यक्रमावर २ कोटींची उधळपट्टी केल्याचा दावा केला जात होता. यावर त्या म्हणाल्या, आम्ही करमणुकीचे कार्यक्रम घेत नाही, लाभार्थ्यांना तिथे आणणार असू तर तुमच्या पोटात का दुखतं?, माझ्या विरोधकांना मी इतकंच सांगेन की, तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ, सामने वार कर फिर मुझे आजमा. ऊसतोड कामगार ही व्होट बँक नव्हे तर बँक आहे, असेही त्यांनी सांगितले.