वसंत मुंडे, बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील संघर्षांनंतर गेल्या वर्षी सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे स्थलांतरीत केलेल्या ‘दसरा’ मेळाव्याला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. हा मेळावा राजकीय विरोधाबरोबरच पक्षांतर्गत नेतृत्व स्पर्धेत प्रभाव टाकणारे ‘शक्तीपीठ’ व्हावे यासाठी गर्दीचा उच्चांक मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऊसतोड मजुरांच्या संपावर या मेळाव्यातून तोडगा काढून राज्यभरातील ऊसतोडणी मजूर व वंजारी समाजाचे नेतृत्व सिध्द करण्याची संधी साधली जाईल, असे मानले जात आहे.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय शक्तीस्थळ म्हणून परळीत गोपीनाथगडाची निर्मिती केली. परिणामी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषणबाजीस बंदी घातली आणि महंत व मंत्री मुंडे यांच्यात संघर्ष उभा राहिला. पहिल्या वर्षी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतल्यानंतर गेल्या वर्षी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मेळावा स्थलांतरीत करत दोन दिवसांत गर्दी जमवून समाजावरील आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. दुसरा मेळावा ऐतिहासिक व्हावा यासाठी समर्थकांनी राज्यभर तयारी सुरू केली आहे. मंत्री मुंडे यांनीही समाजमाध्यमातून ‘आपली परंपरा भक्ती आणि शक्तीचा संगम’ अशी साद घालत मेळाव्याला येण्याचे आवाहन केल्यामुळे यावर्षीचा मेळावा नेमका कसा होतो आणि मुंडे काय बोलतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनाही राजकीय नेतृत्व सिध्द करताना संघर्ष चुकला नाही. भगवानगडावरुन सुरुवातीला भगवान सेनेच्या माध्यमातून राज्यभर संघटन उभे करत मुंडेंनी गडावरील दसरा मेळाव्यातून राजकीय दिशा जाहीर केली. गडाला मानणाऱ्या वंजारा समाजासह धनगर, माळी आणि उपेक्षित मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र करुन आपले राजकीय शक्तीपीठच तयार केले. परिणामी पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेतील विरोधकांनाही मुंडेंना विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेणे अशक्य झाले.

शिवसेनेचा दसरा मेळावा, नागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमी आणि  मुंडेंचा भगवानगडावरील दसरा मेळावा राजकीय चर्चेचे केंद्रिबदूच झाले. मुंडेंनी गडाच्या मेळाव्यातूनच राज्यभर आपला प्रभाव निर्माण केल्यानंतर जवळपास १०० विधानसभा मतदारसंघांत मुंडे राजकीय ताकद निर्माण करण्यात यशस्वी ठरले. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर मुलगी पंकजा मुंडे यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढून राज्यभरातील मुंडे समर्थकांची मोट बांधली. विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा झाल्याने पंकजा या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांतून झाला. तर पंकजा यांनीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून आपली इच्छा लपून ठेवली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेचा त्यांनाही सामना करावा लागल्याचे काही घटनांमधून समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांच्याकडील जलसंधारण खाते काढल्यानंतर ही अंतर्गत बाब प्रकर्षांने जाणवली. या पाश्र्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला महत्व आले आहे.

यावर्षी ऊसतोड कामगार संपावर असल्याने या मेळाव्यात तोडगा काढून राज्यभरातील लाखो ऊसतोड कामगारांचे एकमुखी नेतृत्व आपल्याकडे असल्याचे सिध्द करण्याची संधीही साधली जाईल असा कयास आहे. गेल्यावर्षी सावरगावमधील मेळाव्यातच घोषणा केल्यानुसार संत भगवानबाबा यांचे दोन एकर जागेत भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. पाण्यात बसून ज्ञानेश्वर वाचतानाची २५ फुट उंचीची बाबांची मूर्ती साकारली आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील संतांची स्मारके अपवादानेच असून त्यात आता भगवानबाबांचे स्मारक झाले आहे. राज्यासह इतर राज्यातील विशेषत वंजारा समाज मोठय़ा संख्येने या मेळाव्याला येणार असल्याने मेळाव्यातील गर्दी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाचे सामाजिक व राजकीय ‘सीमोल्लंघन’ करणारी व्हावे, यासाठी मुंडे समर्थकांची तयारी सुरू आहे.

* गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढून राज्यभरातील मुंडे समर्थकांची मोट बांधली. विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा झाल्याने पंकजा या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांतून करण्यात आला.

* पंकजा यांनीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून आपली इच्छा लपून ठेवली नाही.

*पहिल्या वर्षी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतल्यानंतर गेल्या वर्षी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मेळावा स्थलांतरीत करत दोन दिवसांत गर्दी जमवून समाजावरील आपली पकड मजबूत असल्याचे पंकजा मुंडे यांनी दाखवून दिले.

* दुसरा मेळावा ऐतिहासिक व्हावा यासाठी समर्थकांनी राज्यभर तयारी सुरू केली आहे.

* मंत्री मुंडे यांनीही समाजमाध्यमातून ‘आपली परंपरा भक्ती आणि शक्तीचा संगम’ अशी साद घालत मेळाव्याला येण्याचे आवाहन केल्यामुळे यावर्षीचा मेळावा नेमका कसा होतो आणि मुंडे काय बोलतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे.