राज्यातील करोना संसर्ग वाढत आहे. मुंबई, पुणे या प्रमुख शहरांपाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाण आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आज औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून लॉकडाउनच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर आज अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला. ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशंत: लॉकडाउन असणार आहे. तर, प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी हा देखील इशारा दिला की, अंशत: लॉकडाउनच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याशिवाय खासगी व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील सर्वांनी सोबत बाळगणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तर, या अंशत: लॉकडाउनच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलंतरण तलाव, शाळा-महाविद्यालयं संपूर्ण बंद असतील. विशेषकरून मंगलाकार्यालयं, सभागृह यामध्ये होणाऱ्या विवाह समारंभांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर, शनिवारी व रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय, दूध विक्री, भाजीपाला,फळविक्री सुरू असणार आहे.