अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा २०१९ वर्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात राज्यात महिलांमधून परतवाडा येथील पर्वणी पाटील अव्वल आली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि मार्गदर्शकांना दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी विविध पदांसाठी परीक्षा घेतली होती. सध्या पर्वणी ही नागपूर येथे परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. पर्वणी हिने अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेची वाट चोखाळली. याआधी दिलेल्या परीक्षेत तिचा राज्यात महिलांमधून तिसरा क्रमांक आला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वनपरीक्षेत्र अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, तहसीलदार अशा विविध पदांच्या परीक्षांमध्ये पर्वणी हिने यश मिळवले आहे. अचलपूर तालुक्यातील कुष्टा हे तिचे मूळ गाव आहे. वडील रवींद्र पाटील हे पथ्रोट येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तिची आई करजगाव येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. परतवाडा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर संगणक अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण तिने मुंबई येथे घेतले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियमित अभ्यास आणि वाचन हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे तिने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.