बिहार केडरचे २००६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असणाऱ्या शिवदीप वामनराव लांडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. लांडे यांना महाराष्ट्र सरकारने दहशतवादीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्त केलं आहे. पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक म्हणून गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करण्यासाठी ओळखले जाणारे लांडे यांना सध्या महाराष्ट्रामध्ये प्रतिनियुक्ती म्हणून पोस्टींग देण्यात आलं आहे. सध्या ते हैदराबादमध्ये एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. ९ ऑक्टोबरला प्रशिक्षण संपल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. विदर्भातील अकोला जिल्ह्यात राहणारे लांडे हे अमली पदार्थांसंदर्भातील शाखेमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम करायचे. या कालावधीमध्ये त्यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी यशस्वी छापे टाकले होते. एका छाप्यादरम्यान त्यांनी दोन कोटींची अमली पदार्थ ताब्यात घेत सर्वाधिक किंमतीची माल पकडण्याचा विक्रम नोंदवला होता. आपल्या नव्या नियुक्तीसंदर्भात लांडे यांनी न्यूज १८ शी बोलताना, "सरकारने माझ्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी टाकली असून मी ती प्रमाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन," असं म्हटलं आहे. आयपीएस अधिकारी असणाऱ्या लांडे यांनी तपास अधिकारी म्हणून नक्षलग्रस्त मुंगेरी जिल्ह्यामधून २०१० साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ते मुंगेरीचे अपर पोलीस अधिक्षक म्हणूनही काही काळ काम करत होते. त्यानंतर त्यांना पाटणा शहरामध्ये एसपी पदावर नियुक्त करण्यात आलं. राज्याच्या राजधानीमध्ये त्यांनी आपल्या कामाने पोलीस खात्याबद्दल सामान्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम केलं. नोव्हेंबर २०११ मध्ये लांडे यांची पाटण्यामधून बदली करुन त्यांना आररिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आला. यावेळी लांडे यांच्या बदलीला पाटण्यातील स्थानिकांनी विरोध केला होता. अनेक तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी लांडे यांच्या बदलीचा विरोध करण्यासाठी राज्य सरकारविरोधात आंदोलनही केलं होतं. लांडेंच्या चाहत्यांनी फेसबुकवर त्यांच्या समर्थनार्थ एक पेजही सुरु केलं असून त्याला हजारोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत.