प्रशांत देशमुख लाखोंची थकबाकी; सर्व नि:शुल्क देणे अशक्य वर्धा : जिल्हय़ातील सर्वच करोनाबळींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेण्याचे वर्धा नगर परिषदेने आता टाळले असून अंत्यसंस्काराचा पुढील खर्च कोण करणार, हा पेच उभा झाला आहे. जिल्हय़ातील सेवाग्राम व सावंगी ही दोन मोठी करोना समर्पित रुग्णालये वध्रेलगत असल्याने या ठिकाणी मृत पावलेल्या करोना बळींवर वर्धा पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात. अंत्यसंस्कार व दाह संस्काराची जबाबदारी वर्धा पालिकेने वसुधा फोऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर सोपवली. त्यांनी ना नफो, ना तोटा तत्त्वावर प्रत्येक अंत्यसंस्काराचे अडीच हजार रुपये आकारले. वर्धेखेरीज जिल्हय़ातील सर्वच भागातील वध्रेत मृत पावलेल्यांचा अंत्यसंस्कार खर्च करण्याबाबत पालिकेने सुरुवातीला आढेवेढे घेतले होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आपला परका असा भेद न करता अंत्यसंस्कार करण्याची सूचना करीत निधीही उपलब्ध करून दिला. मात्र आता दैनंदिन मृत्यूसंख्या तीस ते चाळीस दरम्यान होत असल्याने वर्धा पालिकेने हा खर्च असहय़ असल्याचे नमूद करीत जिल्हा प्रशासनाकडे निधीची मागणी केली. वर्धा पालिकेतर्फे स्मशानभूमीची देखभाल व अंत्यसंस्काराचे कंत्राट देण्यात आले आहे. ३१ मार्च २०३१ पर्यंत एकूण ७४५ मृतदेहांवर दाहसंस्कार झाले. त्यापोटी वसुधा संस्थेला पालिकेने १८ लाख ६२ हजार रुपये दिले. १ एप्रिलपासून मृत्यूसंख्या वाढल्याने एका दिवसाचा खर्च तीस लाख रुपयावर पोहोचला आहे. एप्रिल व मे चा अंदाजित खर्च ६० लाख रुपये अपेक्षित असल्याने हा खर्च आपत्ती व्यवस्थापन निधीतून मंजूर करण्याची विनंती पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यावर उत्तर अप्राप्त आहे. दरम्यान, वसुधा संस्थेने आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे धाव घेत मदतीची विनंती केली. ५ मेपर्यंत १ हजार ३५१ मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची रक्कम ३३ लाख ७७ हजार रुपये झाली असून त्यापैकी १३ लाख ३५ हजार रुपये प्राप्त झाले. पालिकेने निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केल्याने संस्थेच्या कार्यावर ताण आला आहे. यात मार्ग काढण्याची विनंती संस्थेने आमदारांकडे केली. त्या अनुषंगाने प्रशासनाशी चर्चा केल्यावर सर्वच बाबी मोफ त देणे कसे शक्य होणार, अशी शंका उपस्थित करण्यात आली. काही कुटुंबाने स्वत: खर्च केला पाहिजे, अशी अपेक्षा आली. पण हे ठरवणार कोण व कसे, हा पेच पुढे आला. लाकूड व अन्य साहित्याची जुळवाजुळव पावसाळय़ापूर्वी करावी लागते. त्यासाठी आताच पैसे अपेक्षित आहे. मात्र तूर्तास तोडगा निघालेला नाही. आमदार डॉ. भोयर यांनी पालिकेला ६० लाख रुपयाचा निधी जिल्हास्तरीय योजनांतर्गत उपलब्ध करून देण्याचे पत्र प्रशासनास दिल्याचे नमूद केले. वसुधा फोऊंडेशनचे दिलीप तिवारी म्हणाले की, सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून आम्ही हे कार्य करीत आहोत. आता खर्च वाढतच असल्याने व पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी आर्थिक साहाय्य अपेक्षित आहे.