लग्नात जेवण वाढण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या ओकराम दलग्या पावरा (४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरपुर तालुका पोलिसांनी तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा हरणबर्डी पाडा ता.शिरपुर याठिकाणी एक लग्न सोहळा सुरु होता. यावेळी ओकाराम यांनी मटण वाढले नाही, या कारणावरुन करवंद इंगा पावरा (५८), कालु उंदप्या पावरा (५०), कांदलीबाई उंदप्या पावरा (५५) (सर्व रा.हरणबर्डी पाडा ता.शिरपुर) यांनी त्याच्याशी वाद घालून त्यांना हाताबुक्याने आणि दगडाने जबर मारहाण केली. दगडाच्या प्रहारामुळे त्यांच्या मानेचे आणि कमरेचे हाड मोडले गेले. त्यामुळे ते प्रचंड जखमी झाले. ओकराम पावरा यांना उपचारासाठी शिरपुर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर घरी राहून ते उपचार घेत होते.  उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सिताराम दलजी पावरा (४५) (रा.आंबा हारणबर्डी पाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिन्ही आरोपींविरुध्द शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.