भिज पावसाने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याने खरीप पेरणी झाली. ६० टक्के पेरणीचे काम पूर्णत्वाला जाते न जाते तोच पावसाने डोळे वटारल्यामुळे सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.जिल्ह्यात दीड महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. सतत तीन-चार दिवस भिज पाऊस झाल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, मात्र पावसाने ताण दिल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. सिरसम, फाळेगाव, आडगाव, एकांबा, वडद, कानडखेडा या भागातील शेतकऱ्यांनी आर्थिक मदत करावी, असे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. २ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्यानंतर पावसाने पुन्हा डोळे वटारले आहेत. ढग जमतात, पण पाऊस पडत नाही. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट आहे.