देशात शेती, व्यापार, उद्योगांची स्थिती चिंताजनक आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे. पण, अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची धोरणे पुरेशी नाहीत. ग्रामीण भागात वीज, पाणी, दळणवळण व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे आर्थिक विकास रखडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. चोपडा तालुक्यातील तापी शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील होते. शेतकरी, कामगार आणि युवकांचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्रित आल्याचे  पवार यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याही थांबतील. शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडणार नाही. त्यांच्या मालाला हमी देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने मदत करायला हवी. मात्र केंद्र शासन कोणतीही मदत करीत नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. केंद्र शासनाच्या अर्थधोरणावरही त्यांनी टीका केली. देशाचे आर्थिक धोरण मजबूत करण्यासाठी उद्योग, व्यवसायात वाढ करण्याची गरज आहे. केंद्र सरकार त्याबाबत उदासिन आहे असेही ते म्हणाले.

आर्थिक अडचणी, ऊसाच्या कमतरतेमुळे चोपडा शेतकरी साखर कारखाना बंद पडला आहे. तो सुरू करण्यासाठी भाडे तत्वाचा पर्याय न पटणारा आहे. शेतकरी, सभासदांसाठी तो हितावह नसल्याचे त्यांनी सूचित केले.  शेतकरी  अडचणीत आहे तर उद्योग, देश मंदीत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले.

रस्त्यांच्या बिकट स्थितीवर बोट

रस्त्यांच्या बिकट परिस्थितीवर शरद पवार यांनी बोट ठेवले. जळगाव-औरंगाबाद रस्ता इतका खराब झाला आहे  की, त्यावरून यायचे म्हणजे एकतर डॉक्टर सोबत पाहिजे किंवा अंग चेपणारा सोबत हवा. रस्त्यांची दुरावस्था थांबवावी, असे त्यांनी नमूद केले.