दोन टनांचा पहिला तोड लवकरच रवाना; ४२ शेतकऱ्यांकडून लागवड कासा : जव्हार तालुक्यातील पिंपळशेत, खरोंडा या परिसरात मोठय़ा प्रमाणात हिरव्या मिरचीचे उत्पादन केले जाते. मात्र यंदा या परिसरातील मिरची युरोपच्या बाजारपेठांमध्ये जाणार आहे. पुढील आठवडय़ात या परिसरातील दोन टन हिरवी मिरची युरोपच्या बाजारात पाठवण्यात येणार असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पिंपळशेत, खरोंडा, हेदीचा पाडा या गावांतील एकूण ४२ शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. लागवड केलेल्या मिरचीला अधिक उत्पन्न मिळावे आणि आदिवासी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यादृष्टीने आदिवासी भागात काम करणाऱ्या संस्थांनी पाऊल उचलले असून या शेतकऱ्यांची मिरची युरोपीय देशांत विकण्याचा निर्णय घेतला आहे. जव्हार-मोखाडा भागांत आदिवासी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या आर. सी. या संस्थेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. लागवड केलेली हिरवी मिरची निरोगी व चांगल्या प्रतीची निघावी म्हणून आर. सी. संस्थेने तांत्रिक पद्धतीने वाफे, आळे तयार करून मिरचीची लागवड करण्यात आली आहे. गेल्या अडीच महिन्यांत मिरचीचे झाड वाढून मिरची तयार झाली आहे. या मिरचीचा पहिला तोड दोन टन निघाला असून लवकरच ती विक्रीसाठी युरोपीय देशांत पाठवली जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांची मिरची परदेशात विकली जावी यासाठी काही खासगी कंपन्यांनी पुढाकार घेतला असून युरोपियन देशांत मिरची पाठवण्याचा खर्च या कंपन्यांनी उचलला आहे. मिरचीला चांगला भाव मिळावा यासाठी आर. सी. संस्थेने मालवाहतुकीसाठी आर्थिक मदतीचे पाऊल उचलले आहे. जव्हार तालुक्यात पिकली जाणारी मिरची युरोपीय देशांमध्ये विकली जाणार आहे याचा आनंद आहे. ही मिरची परदेशात विक्रीसाठी पाठवण्यास अनेक संस्थांनी मदत केली. त्यांच्या मेहनतीने हे शक्य झाले. - विलास हांडवा, मिरची उत्पादक शेतकरी.