भाजपाच्या वाचाळवीरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांबूचा कारखानाच काढावा लागेल असा खोचक सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पंढरपुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पक्षातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालावा लागेल असे वक्तव्य केले होते. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी हा खोचक टोला लगावला आहे. गडकरी म्हणतात तसे खरंच करायचे असेल तर पंतप्रधानांना बांबूचा कारखानाच काढावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून तालुका आणि गावपातळीवरचे नेते पक्ष चर्चेत राहावा म्हणून शिवसेनेसोबत युतीची विधाने गावपातळीवरचे नेते करत असतात असाही टोमणा त्यांनी मारला आहे.

हनुमानासंदर्भात जे वाचाळवीर बोलत आहेत त्या भाजपाच्या वाचाळवीरांसाठी सामना च्या अग्रलेखातून टीका केल्यावर आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपाने आता राम मंदिरावर बोलणेही बंद करावे असाही उपरोधिक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.