सध्या देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर जून महिन्याच्या मध्यापर्यंतच देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येने ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि दिल्लीतही करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. १६ आणि १७ जून रोजी दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते दोन टप्प्यांमध्ये संवाद साधणार आहेत. दरम्यान, या बैठकीअंतर्गत १७ जून रोजी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहे.

देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २४ मार्च रोजी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाउनमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली होती. तसंच ८ जूनपासून अनलॉक १ अंतर्गत काही प्रमाणात सुट देण्यास सुरुवात करण्यात आली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीत सर्व प्रथम सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. तसंच अनलॉक १ अंतर्गत काही प्रमाणात सुट देण्यात आली, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची समिक्षाही करण्यात येऊ शकते. याव्यतिरिक्त राज्यांमधील परिस्थितीत सुधारण्याकरिता काही सूचनाही करण्यात येऊ शकतात.


दिल्ली, महाराष्ट्र, गुजरातसाठी काय ?

दिल्लीत करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणीही करोनाबाधितांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर गुजरातचा विचार केला तर त्या ठिकाणीही सुरूवातीपासूनच करोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही घट दिसून आली नाही. अशा परिस्थितीत ते करोनाचा अधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांमध्ये कोणती रणनीती वापरतील हे पाहावं लागणार आहे.

देशात सुरू असलेल्या अनलॉक १ नंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. परंतु या काळात काही राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सरकानं सुट देण्याचा निर्णय घेतसा असला तरी दुसरीकडे पंजाबमध्ये लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहावं लागणार आहे.