पोलादपूर बस अपघातातील बस अखेर बाहेर काढण्यात आली आहे. 28 जुलैला दापोली कृषी विद्यापीठाची बस 800 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला. तर या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले. कुलगुरू भवनातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काढलेली ही सहल होती. यामध्ये इतर विभागातील कर्मचारी, त्यात प्रामुख्याने कारकून आणि वरिष्ठ पदावर काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते. साधारणपणे दरवर्षी हे कर्मचारी जुलै ते ऑगस्टदरम्यान वर्षा सहल काढत असत.आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. ही बस काढण्याचे काम सुरु असल्याने सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असेही आवाहन रायगड प्रशासनाने केले होते. आता अखेर ही बस बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी मृत व्यक्तीच्या नातेवाईक उपस्थित होते. या घटनेच्या ३ महिन्यानंतर ही नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. यावेळी नातेवाईकांनी संबंधित घटना उघडकीस आणण्यासाठी सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टची मागणी केली.