निलेश साबळे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या तिन्ही कलाकारांविरोधात संभाजी ब्रिगेडने पोलिसात तक्रार दिली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शो मधून हे कलाकार घराघरात पोहचले आहेत. मात्र या तिघांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरात त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही कलाकारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड या महापुरुषांची नक्कल करुन विनोद केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याच प्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळेंनी माफी मागावी असं म्हटलं होतं. ज्यानंतर निलेश साबळे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा गेली आहे त्यामुळे ते महापुरुषांचा अपमान करत आहेत अशीही टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. दरम्यान या सगळ्या प्रकरणी निलेश साबळे यांनी माफी मागितली असली तरीही त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आता सोलापुरात निलेश साबळे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने दाखल केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.