“संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला, तरी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर ते पूजा चव्हाणला न्याय देण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असेल” असे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा विषय लावून धरला होता. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती.

“हा फक्त पूजा चव्हाण, संजय राठोड यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. बलात्काऱ्यांना, हत्याऱ्यांना बसण्याचा अधिकार नाही” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“आज १८ दिवस झाले. पण अजून एफआयआर दाखल झालेला नाही. आम्ही पोलिसांची भेट घेतली, पण अजून कारवाई झालेली नाही. या प्रकरणात पहिल्यादिवसापासून ज्या पोलिसांची संदिग्ध भूमिका आहे, त्यांना त्या जागेवर बसण्याचा अधिकार नाही” असे आक्रमकपणे चित्रा वाघ यांनी सांगितले. त्यांनी औरंगाबाद, मेळघाट अशी काही उदाहरणे दिली, “पोलिस एका बाजूला सांगतात, शोध सुरु आहे पण पुरावे मिळत नाही, अशा अकार्यक्षम पोलिसांना खात्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.