गेल्या महिन्याच्या सुरवातीला झालेल्या ‘निसग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांचा वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्याांनी अथक प्रयत्नांनंतर अखेर पूर्ववत केला आहे.

गेल्या ३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळाचा सर्वांत जास्त फटका रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांना बसला. या तालुक्यांमधील महावितरण कंपनीची संपूर्ण यंत्रणा भुईसपाट झाली. ४७ उपकेंद्रे बंद पडली, तर ५ हजार ७०८ रोहित्रे जमिनदोस्त झाली. त्यामुळे स्वाभाविकपणे बहुसंख्य गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसामुळे काम आणखी अवघड होऊ न बसले. शिवाय, करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे  एकत्र येऊन काम करण्यावर खूपच मर्यादा येत होत्या. तरीसुद्धा वादळामुळे उद्ध्वस्त गावे, बागा आणि कुटुबांच्या पुनर्वसनासाठी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत होणे अत्यंत गरजेचे होते.

ही निकड लक्षात घेऊन वादळाच्या दुसऱ्याच दिवशी ऊ र्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांनी संपूर्ण कोकणातील वीजपुरवठय़ाचा आढावा घेतला. त्यांनी त्याच दिवशी आदेश देऊन राज्याच्या अन्य जिल्ह्यंमधून  महावितरणच्या तंत्रज्ञ—कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक या तालुक्यांमध्ये पाठवली. तसेच रोहित्र व वीजेच्या खांबांसह विविध साधनसामग्री मुबलक प्रमाणात पुरवली. त्याचबरोबर, डोंगर—दऱ्यातून, कोकणाच्या मुसळधार पावसात वाहतूक करून ही सामग्री जागेवर पोचवणे हेसुद्धा एक आव्हानच होते. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी या पथकांना श्रमदानासह शक्य ते सर्व सहाय्य केले. अशा प्रकारे सर्वाचे सहकार्य आणि महावितरणच्या तंत्रज्ञ—कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे सुमारे ५० दिवसांनतर या तीन तालुक्यांमधील सर्व गावे प्रकाशमय झाली आहेत.