राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराने घेतलं जातं. तसंच पवार घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं घराणं आहे. अशात पवार घराण्यात ऑल इज नॉट वेल अशी चर्चा आता रंगली आहे. याला कारण आहे प्रियम गंधी यांनी लिहिलेलं ‘ट्रेडिंग पावर’ हे पुस्तक. हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. मात्र त्याआधीच ते गाजतं आहे ते त्यामध्ये असलेल्या दाव्यांमुळेच. पवार कुटुंबात सारंकाही आलबेल नाही असा दावा यात करण्यात आला आहे. पार्थ पवारांना डावललं जातंय आणि रोहित पवारांचं बळ वाढवलं जातं आहे असं या पुस्तकात म्हटलं गेलं आहे.

पवार कुटुंबात वाद म्हणावेत असे नाहीत. पण पक्षावर कुणाची कमांड राहिली पाहिजे या मुद्द्यावरुन पवार कुटुंबात सारं आलेबल आहे असंही म्हणता येणार नाही. पार्थ पवारांना ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला हवं होतं तसं मिळालेलं नाही. त्यामुळे पवार कुटुंबात वाद नसले तरीही सारं काही आलबेल आहे असंच अधोरेखित होतं आहे असं प्रियम गांधी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छुक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यांना एकाकी पाडलं गेल्याची चर्चा त्यावेळीही राजकीय वर्तुळात रंगली होती. तसंच अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती. आता या पुस्तकामुळे पुन्हा एकदा या सगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसंच पवार कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याचीही चर्चा रंगली आहे.