उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली. स्फोटके पेरणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणांत शर्मा यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्याचा दावा ‘एनआयए’ने न्यायालयात केला आहे.  मात्र आता या प्रकरणामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खऱ्या सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. प्रदीप शर्मा यांना अटक झाली असली तरी त्यांच्यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके सापडली. तेव्हा त्याचा मास्टर माईंड कोण हे शोधण्याची मागणी मी केली होती, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच आपण मागणी केल्यानंतर केंद्र शासनाने तपास आपल्या हाती घेतल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. “तीन महिन्यापूर्वी सचिन वाझे यांना अटक झाली तर काल एनआयएने शर्मा यांच्यावर कारवाई केली. मात्र या दोघांच्या मागे दुसरीच ताकत आहे. भाजपा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून अनिल देशमुख यांना मात्र गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता,” असं मुश्रीफ म्हणाले.

नक्की वाचा >> अयोध्या जमीन खरेदी प्रकरण : “भाजपा, RSS आणि केंद्र सरकारने खुलासा करावा”

अ‍ॅम्बी व्हॅली येथून शर्मा यांना ताब्यात घेतलं

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या अटकेनंतर ‘एनआयए’ने या आठवड्यात तपासाचा वेग वाढवला. आठवड्याच्या सुरुवातीलाच मनसुख हत्येत प्रत्यक्ष सहभागप्रकरणी संतोष शेलार, आनंद जाधव या दोन तरुणांना लातूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली येथून शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले.

इतर दोघांनाही अटक…

या गुन्ह्यांतील शर्मा यांचा सहभाग स्पष्ट करणारे थेट, परिस्थितीजन्य, तांत्रिक पुराव्यांआधारे त्यांच्याकडे रात्रभर चौकशी करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. याच सुमारास ‘एनआयए’च्या अन्य एका पथकाने सतीश ऊर्फ विकी बाबा आणि मनीष सोहनी या दोन आरोपींनाही अटक केली.

नक्की वाचा >> “राज्य सरकारने संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या, आता मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा”

…म्हणून अटकेला एवढा उशीर

राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात शर्मा, शेलार यांची नावे पुढे आली होती. विशेष न्यायालयानेही गुरुवारी या दोघांच्या अटके ला इतका विलंब का, असा प्रश्न ‘एनआयए’ला के ला. नावे पुढे आली असली तरी अटक करण्याइतके पुरावे हाती आले नव्हते. ते मिळताच कारवाई के ल्याचे ‘एनआयए’च्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

अनेक तास चर्चा…

‘एनआयए’च्या तपासात शर्मा यांच्या संशयास्पद हालचाली पुढे आल्या होत्या. मनसुख यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी शर्मा मुंबई पोलीस आयुक्तालयात उपस्थित होते. मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासह त्यांनी मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही बैठक अनेक तास चालली. त्यानंतर ते राज्य पोलीस दलातील अतिरिक्त महासंचालकास भेटले. याशिवाय पश्चिाम उपनगरांत आरोपींच्या बैठकीत ते उपस्थित होते. याच बैठकीत हत्येचा कट आखला गेला, अशी माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती.