झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात २४ तारखेला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये ३५ संघटना सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसते
देशाची आजची परस्थिती अराजकता माजेल अशी झाली आहे. या परिस्थितीला भाजप आणि आरएसएस हे जबाबदार आहेत. कारण देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसत आहे.धमकावणे, दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

भीती आणि दहशतवाद निर्माण झाला, ही दहशत वाढवी म्हणून तीन कायदे लागू करण्याचे काम सरकारने केले आहे, ते असंवैधानिक आणि आरएसएस प्रणित आहेत. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सरकार दारुडयांसारख आहे. दारुडया व्यक्तीला दारू नाही मिळाली तर, घरातील वस्तू विकतो तसे हे सरकार सोन्याचं अंड देणारी भारत पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहे अशा शब्दात वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर निशाणा साधला. यामुळे प्रचंड बेरोजगारी भविष्यात वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी नाईट लाईफ अनुभवली : प्रकाश आंबेडकर
मी नाईट लाईफच्या बाजूने असून ही लाईफ मी अनुभवली आहे. त्यामुळे सर्व घटकाला याचा फायदा होणार आहे, असे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.