अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काही तासांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी होणार असून, अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आंबेडकर यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही आक्षेप नोंदवला आहे.

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. “आज संपूर्ण जग भारतीयांना संशयाच्या नजरेनं पाहत आहे. आपल्याला वाटत की, ते द्वेष करत आहेत. पण, सत्य परिस्थिती ही आहे की, इथले वैदिक धर्म मानणाऱ्यांनी अन्य धर्मांवर अतिक्रमण करत आहेत. जे सध्या अयोध्येत होत आहे. इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांनीही म्हटलेलं आहे की, अयोध्येत प्राचीन बौद्ध शिक्षा केंद्र आहे. अलहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्खननामध्ये तिथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडले. असं असूनही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानं तथ्याच्या उलट, भावनांच्या आधारावर राम मंदिर बांधण्याचा निर्णय दिला. तथ्यांच्या आधारावर निर्णय झाला असता, तर जगानं संशय घेतला नसता. असं न केल्यामुळे जगभरात भारत व भारतीयांची प्रतिमा मलिन झाली आहे,” अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

उद्या (५ जुलै) दुपारी १२ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वीच सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येईल. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे. दरम्यान, देण्यात आलेल्या प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे.