मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन केलं जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पोहोचले असून यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना यासंबंधी सांगताना नियम मोडण्यासाठीच आपण येथे आलो असल्याचं म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “या लोकांच्या भावना आहेत. लोकांना आम्ही फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा अशी विनंती करत आहोत. पण कार्यकर्ते ऐकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”. प्रकाश आंबेडकर यांनी नियम मोडले जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असताना नियम मोडण्यासाठीच आपण आलो आहोत असं त्यांनी म्हटलं. तसंच कारवाई करण्याचं आव्हानही दिलं.

“मंदिरं खुली करा अशी लोकांची भावना आहे. लोकच शासनाला दाखून देत आहेत. हे पाहून सरकारने आपली भूमिका बदलावी,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं असून मंदिरात प्रवेश दिला नाही तर जे काही करायचं ते करु असं म्हणाले आहेत. गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे असं सांगितलं असता लोक जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हेच आम्हाला दाखवायचं आहे असं त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांनी आपण मंदिरात प्रवेश करण्यावर ठाम असून स्वत: मंदिरात प्रवेश कऱणार असल्याचं सांगितलं आहे.