काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असल्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे  विधान आणि काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची घटना ताजी असताना पक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भाजप दार बंद करत नाही, असे सूचक उद्गार केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढल्याने महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही आगामी काळात काँग्रेस व इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये येण्याचे संकेत मिळत आहेत.

कर्नाटकमधील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मध्य प्रदेश, राजस्थानातील सरकारबाबतही हेच होणार काय, याबाबत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जावडेकर यांना विचारणा झाली असता, भाजप फोडाफोड करत नसल्याचे स्पष्ट करताना, येणाऱ्यांसाठी दारही बंद करत नसल्याचे सूचक उद्गार जावडेकर यांनी काढले.