पृथ्वीराज चव्हाण यांनी माझं कुटुंब अन् अवघा काँग्रेस पक्षही उद्ध्वस्त केला. काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील बडे नेते संपवण्याचे पाप त्यांनी केले असून, वैयक्तिक पातळीवर आघात करणाऱ्यांना घरी बसवा, सत्तेचा अहंकार व खुच्र्याचा लिलाव करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमानी जनतेने पराभव करून हे पार्सल पुन्हा दिल्लीला धाडावे, असे आवाहन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार उंडाळकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून कराड दक्षिणेतून अर्ज भरल्यानंतर विंग येथे प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांंची मोठी उपस्थिती होती.
उंडाळकर म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसपक्ष व महाराष्ट्रावरील संकटच असून, त्यांना घालवा म्हणून बडे नेते देव पाण्यात घालून बसले आहेत. ही ब्याद नको म्हणून, मला अनेकांचे फोन येत आहेत. त्यांची नावे जाहीर केली तर भूकंप होईल. आपण काँग्रेस श्रेष्ठींविरोधात नसून, पक्षावरही राग नाही. पण, गेल्या साडेतीनवर्षांत आपल्या विरूध्द कारवाया झाल्या. तरी आपण या कटकारस्थानाला समर्थपणे तोंड दिले. मुख्यमंत्री होताना, या महाशयांना मी सूचक असतानाही ते पहिल्यांदा कराडात विषारी विचार घेऊनच आले. या विकृत प्रवृत्तींने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं. माझ्या वाटय़ाला आलेल्या यातना अन्य कुणाच्या वाटय़ाला येऊ नयेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आता, सातारच्या गांधी मैदानावर सभा घ्यायची म्हटलंतर काँग्रेसकडे नेता शिल्लक नसल्याचा टोला त्यांनी लगावला. माझी निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. मात्र, जनरेटय़ामुळेच आपण निवडणूक लढवत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.