भातपिकाला हमीभाव देण्याचे धोरण शासनाचे असूनही सिंधुदुर्गात शासकीय भातखरेदीला प्रारंभ करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. शासकीय भातखरेदी सुरू करण्यात आली नसली तरी दलालांनी मात्र भातखरेदी सुरू करून शेतकऱ्यांची फसवणूक चालविली असल्याचे बोलले जात आहे.केंद्र व राज्य सरकारने गेली काही वर्षे शासकीय दरात भातखरेदीचा उपक्रम सुरू केला आहे. यंदाही सरकारने भाताला हमीभावात अल्पशी वाढ केली आहे. मात्र अद्यापि भातखरेदी उपक्रम सुरू झालेला नाही.महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने शेतकरी संघामार्फत जिल्ह्य़ात भातखरेदी केंद्रे सुरू केली जातात त्यासाठी जिल्हा बँक, जिल्हा पुरवठा अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन व शेतकरी संघाचे चेअरमन यांची बैठक घेऊन कागदपत्रांची पूर्तता व सूचना केल्या जातात, ही कार्यवाही अद्यापी झालेली नाही.सिंधुदुर्गात यंदा भातपीक कापणीच्या हंगामात पाऊस सुरू होता. पण भातपीक दोन-तीन टप्प्यात कापले गेले. शेतकऱ्यांना दसरा, दिवाळी या सणांसह गावागावांत येणारा देवांचा वार्षिक जत्रौत्सवाला पैशांची गरज असते. पण या सणासुदीच्या काळात सरकारच्या उदासीनतेमुळे दलालांचे आयतेच फावले आहे.सरकारने शासकीय दरात भातखरेदीचा निर्णय घेतला आहे, पण सिंधुदुर्गात त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने भातखरेदीच्या हंगामात दलालांनी अल्प दरात भातखरेदीचा धडाका लावला आहे. मात्र याकडे सरकारी पातळीवरून दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी भरडले गेले आहेत.