माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत ५५ हजार २६८ पथकं स्थापन करण्यात आली आहेत. तर आत्तापर्यंत ६९ लाख ९४ लाख घरांना भेट देऊन झाली असून आत्तापर्यंत २ कोटी २४ लाख व्यक्तींची तपासणी झाली आहे. ३७ हजार ७३३ कोविड संशयित व्यक्तींची तपासणीही झाली आहे. त्यापैकी ४ हजार ५१७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे.

या मोहिमेत घरांना भेटी देऊन करोना संशयित रुग्ण शोधणे, कोमॉर्बिड रुग्णांची नोंद करणे, उपचार करणे, आरोग्य व शिक्षण तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला महत्त्वाचे संदेश देणं यासाठीचे सर्वेक्षण केलं जातं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम?

करोनामुक्त महाराष्ट्र हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील शहर, गावं, वस्त्या यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षणही देण्यात येईल. ही मोहीम १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्यात काय काय घडलं त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.