घुसखोरी करून दोन भारतीय जवानांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानच्या कृत्याचा येथे भाजप-सेनेच्या वतीने मोर्चा काढून निषेध करण्यात आला. भारत सरकारने आता ठोस उत्तर देऊन पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
आ. दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जिमखान्यापासून या मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ आल्यावर निषेध सभा घेण्यात आली. या वेळी वक्त्यांनी भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या सैनिकांकडून वारंवार होणाऱ्या भ्याड व क्रूर हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख करत असले प्रकार तसेचपाकिस्तान पुरस्कृत भारतातील दहशतवादी कारवाया कायमच्या थांबवण्यासाठी भारत सरकारने प्रत्यक्ष कृती करून कायमचा धडा शिकवावा, असे मत व्यक्त केले. या वेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चात ज्येष्ठ नेते प्रल्हाद शर्मा, माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष लोटन शेवाळे, ए. व्ही. दंडगव्हाळ, रामा मिस्तरी, दीपक पवार, दादा जाधव, भारत म्हसदे आदी सामील झाले होते.