यात्रेनिमित्त गावाकडे निघालेल्या वडिलांचा आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय ३५), मुलगी आरोही सतीश वळसे-पाटील (वय ३, सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. तर, पत्नी जयश्री सतीश वळसे-पाटील या जखमी झाल्या आहेत. ट्रकचालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय ४०, रा. वाळवी, ता. सिन्नर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वळसे-पाटील कुटुंबीय थापलिंग यात्रेनिमित्त गावाला निघाले होते. पण, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.१५जी.बी. ७२७५) भीमानदी पुलावर पाठीमागून दुचाकीला ( एमएच १४डीएल१५५७ ) जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश वळसे-पाटील व मुलगी आरोही हे दोघेही ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्यूमुखी पडले. तर, पत्नी जयश्री याही गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातानंतर, परिसरातील नागरिकांनी मुलगी व वडिलांना तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सतीश हे पिंपरी, काळेवाडी येथे एका कंपनीत कामाला होते. तेथे ते कुटुंबासह राहत होते. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.