सलग तीन वर्ष पन्नास पैशापेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना सरकारने कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. निळवंडेचे पाणी वर्षभरात या परिसरात आले पाहिजे, यासाठी आपण आंदोलन उभारु असा इशाराही त्यांनी दिला.

तालुक्यातील अस्तगाव येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ  कार्यकर्ते रामभाऊ जेजुरकर होते. यावेळी पंचायत समिती उपसभापती दीपक  तुरकणे, माजी सभापती निवास त्रिभूवन, जि.प. सदस्य राजेंद्र लहारे, सोसायटीचे अध्यक्ष विजय गोर्डे, उपसरपंच वैशाली गवांदे आदि उपस्थित होते. विखे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप के ला. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुद्यावर तसेच पाटपाण्यासाठी आपण आता वर्षभर लक्ष केंद्रित करणार असून, त्यासाठी आंदोलन उभारणार आहोत. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या मंडळाच्या विरोधात दोन जण उभे राहिले आहेत. लोकशाहीची प्रक्रिया आहे, ती पार पाडावी लागेल, त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. आम्ही गणेश कारखाना दोन वर्षांपासून तोटय़ात चालवितो. परंतु सहकार मंदिरात राजकीय प्रतिष्ठा महत्वाची नसून कामगार व शेतकरी महत्वाचा आहे. प्रास्ताविक माजी सरपंच अशोक नळे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. संजय शेळके  यांनी केले.