काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला असल्याचं बोललं जात आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचा खुलासा केला आहे. मुलगा सुजय विखे याने भाजपा प्रवेश केल्यापासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. पण आपण राजीनामा देणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं.

मुलाने भाजपात प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं होतं. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं होतं.

नगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं.

यावेळी त्यांनी नगरच्या जागेवरुन सुरु असलेल्या संघर्षाबाबत स्पष्टीकरण दिले होते. विखे म्हणाले होते की, माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिला हे मुळात चुकीचे आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरु होत्या. यामध्ये काही जागांबाबत आदलाबदलीचा राष्ट्रवादीचा आग्रह होता. नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचा सलग तीनदा पराभव झाला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली तर आघाडीचा एक जागा वाढेल अशी माझी भुमिका होती.