काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व युवा नेते राहुल गांधी यांना साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डी येथे आज मुक्काम करावा लागला. त्याकरिता त्यांना काँग्रेसचे नेते कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आग्रह केला.
गांधी हे लोणी येथील सभेनंतर दिल्लीला जाणार होते व पुन्हा पुणे येथे सभेसाठी येणार होते. पण काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनुसार गांधी हे शिर्डी येथे मुक्काम करणार आहेत. गांधी यांची पहिली सभा ओरिसा येथे होती. त्यानंतर ते लातूरची सभा करून लोणी (ता.राहाता) येथील सभा करून दिल्लीला जाणार होते. प्रचाराच्या धावपळीत त्यांना साईबाबांचे दर्शन होणार नव्हते. त्यांची साईबाबांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. विखे यांनीही त्यांना आग्रह केला. त्यामुळे त्यांनी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. गांधी हे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शिर्डीला पूर्वी एकदा आले होते. त्या वेळीही त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले होते. आता ते दुसऱ्यांदा बाबांचे दर्शन घेणार आहेत.
गांधी यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाल्याने सुरक्षायंत्रणेला मोठी कसरत करावी लागली. तातडीने बंदोबस्त वाढवावा लागला. शिर्डी येथे खास सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली. गांधी हे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास थांबणार असून आज दिवसभर या हॉटेलची तपासणी करण्यात आली. गांधी यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश, कृषिमंत्री विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी नेत्यांशी गांधी हे शिर्डी मुक्कामात चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना काँग्रेस पक्षात आणण्यात विखे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे वाकचौरे यांच्यासाठी गांधी यांची प्रचारसभा घेण्यात आली. ही सभा शिर्डी येथे होणार होती. पण तेथे गर्दी जमणार नाही, अशी भीती काँग्रेसजनांना वाटल्याने त्यांनी ती सभा लोणी येथे ठेवली. विखे यांचे लोणी हे गाव असून शेजारी थोरात यांचे संगमनेर व ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे श्रीरामपूर आहे. काँग्रेसच्या या प्रभावक्षेत्रातून लोकसभेसाठी आणता येतील, म्हणून सभेचे स्थळ बदलण्यात आले होते. लोकांमध्ये मात्र गांधी यांच्या सभेबद्दल पूर्वीएवढे औसुक्य जाणवले नाही.