रायगड जिल्ह्य़ात फळबागा उद्ध्वस्त, चार तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : अरबी समुद्रात घोंघावणारे तौक्ते वादळाचा रायगड जिल्ह्य़ाला जोरदार तडाखा बसला. वादळामुळे चौघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. जवळपास पाच हजार घरांची पडझड झाली. तर फळबागांना पुन्हा एकदा वादळाचा फटका बसला. किनारपट्टीवरील चारही तालुक्यातील वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला.

दिवसभर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे वृक्ष उन्मळून पडणे, घरांची पडझड होणे, सखल भागात पाणी शिरणे, विद्यूत खांब पडणे यांसारख्या घटना घडत होत्या. उरण येथे मंदिराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. नीता नाईक आणि सुनंदा घरत अशी या महिलांची नावे आहेत. दोघीही भाजी विक्रीसाठी आल्या होत्या. पेण तालुक्यातील गागोदे येथे रामा बाळू कातकरी वय ८० यांचा झाडाची फांदी अंगावर पडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी सीमा या जखमी झाल्या. रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत नारायण साबळे यांचा अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला.

वादळामुळे जिल्ह्य़ातील १ हजार ७८४ घरांची पडझड झाली. तर ९ घरे पूर्ण नेस्तनाबूत झाली. प्रशासनाने ५ हजार २४० कुटुंबांतील ८ हजार ३८३ नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित केले होते. जिल्ह्य़ातील १३५ उच्च दाब विद्युत वाहिनीचे खांब, तर ४१८ लघुदाब विद्युत वाहिनीचे खांब पडले. यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला.

प्राणवायू प्रकल्प सुरळीत

कोव्हिड रुग्णालयांनाही वादळाचा तडाखा बसला. ग्रामीण भागातील २९ रुग्णालयांची विद्युत पुरवठा वादळामुळे खंडित झाला आहे. या रुग्णालयांना जनरेटरच्या मदतीने सध्या वीज पुरवली जात आहे.  जिल्ह्य़ातील तीनही प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे तीनही प्रकल्पामधून ६५० मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती आणि वितरण सुरू आहे.

गेल्या वर्षी ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्य़ावर धडकले होते. वादळामुळे मोठी वित्तहानी झाली होती. जवळपास दोन महिने रायगडमधील अनेक भाग अंधारात होते. फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. २ लाखांहून अधिक घरांची पडझड झाली होती.

समुद्रही खवळला..

कोकण किनारपट्टीवर वादळाची तीव्रता वाढली आणि त्याचा फटका रायगड जिल्ह्य़ाला बसला. ताशी ६० ते १०० किलोमिटर वेगाने वारे वाहत होते. पावसाच्या जोरदार सरीही कोसळत होत्या. दुपारनंतर समुद्राला मोठी भरती आली होती. त्यामुळे मोठय़ा लाटा किनारपट्टीवर धडकत होत्या.