रायगड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा ६५ टक्के नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी २१०३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नव्हता. पण ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सात दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणात यंदा मान्सून उशीरा दाखल झाला होता. निसर्ग वादळानंतर पावसाचे प्रमाण मंदावले होते. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ६५५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ५२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात जिल्ह्यात साधारणपणे १२०६ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र १००८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच सलग दोन महिने सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यात कमी पाऊस नोंदविला गेला. ही एक चिंतेची बाब आहे. पण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान ८७४ मिलीमीटर आहे. यंदा सात दिवसात ५६९ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ३ हजार २१६ मिलीमीटर आहे. या तुलनेत ७ ऑगस्टला सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात २ हजार १०३ मिलीमीटर पावसाचीं नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत ६५ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी पावसाची आतापर्यंतची वाटचाल समाधानकारक आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडला असल्याने लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली १८ धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहे. उर्वरीत धरणातील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे.