‘गडावरील १९ कामांसाठी कालबद्ध कृती आराखडा’ कोकण आयुक्तांकडून तयारीचा आढावा रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला येत्या १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी काल रायगड कि ल्ल्याची पाहणी करून किल्ला संवर्धन कामांच्या तयारीचा आढावा घेतला. किल्ल्यावरील १९ कामांसाठीचा कालबद्ध स्वरूपातील कृती आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. रायगड किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने सहाशे कोटींच्या आराखडय़ाला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ५९ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून १५ डिसेंबर पासून विविध कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर एका बैठकीचे आयोजन केल होते. यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी नेगी, कार्यकारी अभियंता मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कि ल्ल्यावरील पथमार्गाची चार कामे मंजूर झाली असून ही कामे डिसेंबर महिन्यात सुरू होऊ न मार्च १८ अखेपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. रायगड किल्ल्याभोवती १३ किलोमिटर लांबीचा परिक्रमा मार्ग तयार केला जाणार आहे. यात दगडी पायवाट, लाइट बोर्ड, आणि माहिती फलकांचा समावेश असणार आहे. नेवासे येथून दगड आणून हा परिक्रमा मार्ग तयार केला जाणार आहे. ३१ मार्चपूर्वी याचे अंदाजपत्रक आणि प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या जाणार आहेत. बालेकिल्ल्याच्या तसेच अष्टप्रधान वाडीच्या दुरुस्ती तसेच संवर्धनाचे काम डिसेंबर अखेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागामार्फत जगदीश्वर मंदिर, राजवाडा, नगारखाना, छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ आणि जिजाऊ समाधी स्थळ यांच्या संवर्धनाची कामे केली जाणार आहेत. २ महिन्यांच्या आत या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पूर्वी गडाच्या पायथ्याशी लाइट अँड साउंड शो करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाने हा लाइट आणि साउंड शो गडावर करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ३४ कोटींचा सुधारित आराखडा मुख्यमंत्र्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. गडावरील १३ तलावातील गाळ काढणे, स्वच्छता गृहाची उभारणी करणे, दिशादर्शक फलक लावणे ही कामे डिसेंबर अखेपर्यंत सुरू होणार आहेत. महावितरणच्या माध्यमातून किल्ल्यावर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरणाच्या तांत्रिक व प्रशासकीय बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मार्चअखेपर्यंत ही कामे पूर्ण करून लगेचच दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली.