रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २०१२ मध्ये हटवला होता. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. माणगाव सत्र न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला असून पुराव्याअभावी ७३ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या निकालाच्या अनुषंगाने माणगाव न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा जगदीश्वर मंदिर परिसरात आहे. २०१२ साली वाघ्या कुत्राचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. या घटनेनंतर साऱ्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्याही जप्त करण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी काही तासातच कार्यकर्त्यांना अटक केली होती. महाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविला होता. महाड न्यायालयातून हा खटला माणगाव न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. माणगाव न्यायालयात वाघ्या कुत्रा हटविल्या संदर्भात शुक्रवारी खटला सुरू होता. यावेळी न्यायालयाने कार्यकर्त्यांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल आठ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे.